बी.कॉमचा निकाल अतिशय कठीण लागला असे सर्वच जण म्हणत होते. मी बी.कॉम झालो. महाराजांनी हे फार पूर्वी सांगितले होते. आता पुढे काय करावे—शिकावे की नोकरी–उद्योग करावा—हे माझ्या मनात सतत चालू होते.
म्हणून मी व्यंकटनाथ महाराजांना पत्र पाठवून विचारले होते—मी I.A.S. करू का? I.F.S. करू का? C.A. करू का? असे अनेक पर्याय मी पत्रात लिहिले होते.
त्यांनी ताबडतोब उत्तर पाठविले—
“सी.ए. कर. सी.ए.चा कोर्स तुला साधेल.”
कॉमर्स फॅकल्टीचे शिक्षणच मुळात माझ्या इच्छेविरुद्ध सुरू झालेले होते. त्यामुळे त्या शिक्षणात गोडी नव्हती. C.A. होण्यातही माझा रस नव्हता आणि त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळही नव्हते.
प्रत्यक्ष भेट झाल्यावर मी महाराजांना विचारले—
“महाराज, तुम्ही मला C.A. करायला सांगितले. पण C.A. म्हणजे नेमके काय हे तुम्हाला माहीत आहे का?”
ते हसून म्हणाले—
“नाही रे बाळ, आम्ही कुठे तुझ्या एवढे शिकलो? सहावी–सातवीचे आमचेच शिक्षण. इंग्लिश येत नाही. पण व्यापारी लोक पैसा आला की लिहितात; खर्च झाला की लिहितात; नफा–तोटा काढतात आणि शेवटी हे सर्व तपासून बरोबर आहे म्हणून सही करतात—हाच तो कोर्स नाही का?”
त्यांनी ऑडिट प्रोसिजरच मला समजावून सांगितले!
आणि ठामपणे म्हणाले—
“तू C.A. होशील.”
बी.कॉम झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मी दूर जाणार—याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे एका दिवशी ते मला म्हणाले—
“बाळ, वेळ मिळेल तेव्हा *दासबोध, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग* मिळाले तर वाच.” “सर्व काही आपोआप होईल.”
विचार करण्याचीही माझी पात्रता तेव्हा झाली नव्हती—असे आज मला वाटते.
आणि खरेच—काही दिवसांतच अकस्मात एका परिचित व्यक्तीकडून मला C.A. कोर्सची ऑफर मिळाली. मी धुळ्याला गेलो आणि 1958 साली C.A.च्या चार वर्षांच्या कोर्सला सुरुवात झाली.
नागपूरला असताना सहजतेने महाराजांचे दर्शन व्हायचे, विविध विषयांवर विचारविनिमय करायला मिळायचा. पण C.A. कोर्सला गेल्यावर महाराजांशी संपर्क जवळजवळ तुटला.
तरीही—
- त्यांचे बोलणे आठवायचे, - मध्येच ते दिसल्यासारखे वाटायचे, - स्वप्नातही दर्शन व्हायचे.
C.A. कोर्समुळे मी निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या सहवासात येऊ लागलो आणि नवीन विषय हाताळू लागलो.
महाराज मला घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत—हेच आतून जाणवत राहायचे. प्रत्यक्ष बोलणे नव्हते, तरी त्यांची योजना चालू आहे—हे सारखे जाणवायचे.
त्यांना हवे तर ते कुठेही येऊ शकत होते, आणि तसे ते माझ्याकडे येऊन जातही असत.
त्यांनी सांगितलेले ग्रंथ वाचणे म्हणजे ब्रह्मांडाचे तत्त्वज्ञान समजण्याची तयारीच होती:
- ब्रह्मांडाची उत्पत्ती, - देवतांची कार्यपद्धती, - नाथपंथाची कार्यपद्धती, - गुरुचरित्रातील रहस्यांचे उलगडे.
हे सर्व ज्ञान मला त्यांच्याकडून मिळणार होते— पण त्यासाठी अवधी लागत होता.
म्हणूनच कदाचित त्यांनी मला C.A. कोर्स करायला सांगितले असावे.
ते म्हणाले होते—
“ह्या ग्रंथांचे वाचन कर. सर्व काही आपोआप होईल.”