चित्रकूट परंपरा — चित्रकूट म्हटले की, त्रेता युगातील रामाची आठवण येते. वनवासात असताना राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान या ठिकाणी राहिले आहेत. आज १३,२८,००० वर्षे लोटून गेली. एवढ्या दीर्घ काळानंतरही राम आणि कृष्ण यांच्याबद्दलची आत्मीयता आजही तितकीच आहे.
याच चित्रकूट भूमीतून योग्यांची जी परंपरा आहे, तिथूनच वेदवर्णित सूर्याची स्तुती मंत्र ऐकू येत असत. ज्ञानेश्वरांनंतर या परंपरेत सत्यमलनाथ, गुप्तनाथ, परमहंसजी, ब्रह्मानंद, परमानंद, काशीनाथ, विठ्ठलनाथ, विश्वनाथ यांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे पंथपरंपरेचे कार्य केले.
गुप्तनाथ (मच्छिंद्रनाथांपासून सातवे नाथ) यांनी चित्रकूट येथे गादीवरून कार्य केले. त्यांच्या नंतर परमहंसजी, ब्रह्मानंद, परमानंद, काशीनाथ, विठ्ठलनाथ, विश्वनाथ यांनीही चित्रकूटवरूनच पंथकार्य चालविले. त्यानंतर माधवनाथांनीही याच गादीवरून कार्याची सुरुवात केली.
चित्रकूटचे वातावरण बदलू लागले. कार्य देवगावला वाढण्याचे संकेत मिळाले. गुरु माता व इतरांनीही तिथून निघण्यास सांगितले. चित्रकूट सोडताना माधवनाथांनी म्हटले होते:
“आम्ही हे स्थान सोडून जात आहोत. जिथे जाऊ तिथे हे मंदिर उभे करू. येथील सर्व महात्म्य तिथे नेऊ. आता येथे पुन्हा कधी पाऊल ठेवणार नाही.”
आणि ते निघून देवगाव रंगारी येथे स्थायिक झाले.
काळाच्या ओघात व्यंकटनाथ महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव मंगलनाथ यांना वयाच्या दहाव्या वर्षी चित्रकूटच्या गादीवर बसविण्यात आले. मोठा समारंभ झाला आणि त्या वेळी व्यंकटनाथ महाराजही उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर मंगलनाथांनी असा मुद्दा मांडला की— चित्रकूट ही जणू व्यंकटनाथांची आध्यात्मिक जन्मभूमीच, म्हणून त्यांनी महाराजांना चित्रकूटला नेण्याचा प्रयत्न केला.
मंगलनाथ महाराजांनी व्यंकटनाथ महाराजांना चित्रकूटला आपल्या सोबत यावे असा आग्रह धरला. महाराजांनी मला बोलावून विचारले:
“चित्रकूटला जावे का? काय करावे?”
मी सांगितले:
“मंगलनाथांची इच्छा आहे आणि ते तुमचे आधार शोधत आहेत. मुलगा आपल्या व्यवसायात किंवा परंपरेत पुढे जात असेल तर वडिलांनी आधार देणे हेच योग्य. व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही गेलात तर त्यांना बळ मिळेल.”
महाराजांनी विचारले:
“आम्ही गेलो तर काय होईल?”
मी म्हणालो;
“आपण जाणार हे कळले की तुमचे जवळजवळ सर्व शिष्य तुमच्यासोबत जातील.”
मंगलनाथ महाराज म्हणाले:
“जेवढे लोक येतील त्यांना आम्ही आमच्या खर्चाने घेऊन जाऊ. स्पेशल ट्रेनही करायला तयार आहोत.”
महाराज मला म्हणाले— “निर्णय तू सांग.”
मी मंगलनाथांना सांगितले:
“व्यंकटनाथ महाराज तुमचे वडील आहेत, पण माझे गुरु आहेत. माझ्या गुरूंनी कुठे जावे हे मी ठरवू शकत नाही. पण मला विचारलात तर— मी गुरूंना चित्रकूटला जाऊ देणार नाही.”
त्याचे कारण स्पष्ट करताना मी सांगितले:
- माधवनाथांनी स्वतः चित्रकूटचा त्याग केला होता. - ते पुन्हा कधी गेले नाहीत. - त्यांनी कोणालाही तेथे न जाण्याची आज्ञा दिली होती. - त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते: “ही शापित भूमी आहे; मी इथे पुन्हा येणार नाही.”
माधवनाथांनी चित्रकूटचे सर्व माहात्म्य स्वतः देवगाव रंगारी येथे आणले होते. त्यामुळे व्यंकटनाथ महाराजांचा संबंध हा चित्रकूटशी नाही तर देवगाव रंगारीशीच आहे.
मी म्हणालो:
“गुरूंनी मला परवानगी दिली तर मी त्यांना चित्रकूटला जाऊ देणार नाही.”
मात्र “आईंचा संबंध वेगळा आहे. मंगलनाथ महाराज आईला घेऊन जाऊ शकतात.”
महाराज म्हणाले:
“नरेन्द्र म्हणतो ते बरोबर आहे. तो जे सांगेल त्याप्रमाणेच करू.”
परिणाम —
- व्यंकटनाथ महाराज चित्रकूटला गेलेच नाहीत. - काही भक्तमंडळी आणि आई मात्र मंगलनाथांसोबत चित्रकूटला गेले. - महाराजांनी त्यांच्या गुरु माधवनाथांनी दिलेली धोरणेच पाळली.
या संपूर्ण प्रसंगातून व्यंकटनाथ महाराजांनी माझीच परीक्षा घेतली—
- गुरु निष्ठेचे परीक्षण झाले. - माधवनाथांच्या आज्ञेचे पालन राखले. - आणि गुरु-परंपरेच्या तत्वांना तडा जाऊ दिला नाही.