“गुरु देह नाही, गुरु ग्रंथ नाही, गुरु नाही जादू-चमत्कार काही। शिवोऽहम् शिवोऽहम् नाद अंतरात, भजावे गुरु व्यंकटेशास नित्य॥” या वचनाचा अर्थ सांगताना नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की गुरुतत्त्व हे शरीर, शब्द, रूप किंवा बाह्य आचार-विचारांवर अवलंबून नसते. गुरुचा देह भौतिक नियमांनी बांधलेला असतो; परंतु गुरुतत्त्व—त्यांचे वास्तविक आध्यात्मिक स्वरूप—हे या सर्वांपासून निराळे, मुक्त आणि निर्लेप असते.
हे स्पष्ट करण्यासाठी महाराजांनी एक प्रसंग सांगितला. दुर्वास ऋषी हजार शिष्यांसह भ्रमंती करत होते. ते अत्यंत कृश दिसत असत; पण त्यांचे शिष्य जितके जेवत, तेवढे अन्न दुर्वास ऋषींना एकट्याला लागत असे. त्यामुळे शिष्यांच्या मनात नैसर्गिकच संभ्रम निर्माण झाला. एकदा ऋषींना श्रीकृष्णाला भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी एका शिष्याला आज्ञा दिली की समुद्रापाशी जाऊन “जर माझ्या गुरूंनी जन्मापासून आजपर्यंत अन्नाचा एक कणही खाल्ला नसेल, तर मला मार्ग दे” असे म्हणावे. शिष्य गांगरला; पण आज्ञा मोडणे शक्य नव्हते. आश्चर्य म्हणजे, समुद्र दुभंगला आणि तो श्रीकृष्णाकडे पोहोचला. परतीसाठी श्रीकृष्णांनी आपल्या मुलाला सांगितले की “माझे वडील जर आजन्म ब्रह्मचारी असतील तर समुद्र मार्ग देईल”. शिष्य पुन्हा गोंधळला; परंतु समुद्र पुन्हा दुभंगला. या प्रसंगातून महाराज सांगतात की गुरु जे भौतिक पातळीवर करीताना दिसतात तसेच ते असतातच असे नाही, कारण गुरुतत्त्व हे देहापासून पूर्ण वेगळे आणि दैवी असते.
महाराज म्हणतात की मंत्र–तंत्र, जादू–चमत्कार यांना अध्यात्मात काहीही स्थान नाही. परंतु साधना, योगाभ्यास आणि गुरुशी समरसता यांमधून घडणाऱ्या काही घटना सामान्यांना चमत्कार वाटतात. प्रत्यक्षात त्या घटना सूक्ष्म ऊर्जात्मक आणि वैज्ञानिक नियमांवर आधारित असतात. सद्गुरू कधीही अलौकिक शक्तींचा प्रदर्शनासाठी वापर करत नाहीत; कारण गुरुतत्त्व स्वतःच ईश्वराशी जोडलेले असते.
समाजात असा समज असतो की गुरु खातो, झोपतो, त्याला आवडी–निवडी असतात म्हणजे तो गुरु कसा? महाराज स्पष्ट करतात की शरीर आले की शरीरधर्म अपरिहार्य असतात, पण गुरु म्हणजे शरीर नव्हे—तो शुद्ध चेतना, शुद्ध आत्मा. आत्मा सदैव शुद्ध, निर्लेप आणि बंधनरहित असतो.
समरसता म्हणजे गुरु–भक्तीची पराकाष्ठा. हनुमंताला सीतामाईंनी दिलेल्या मोत्यांच्या कंठ्यात त्याने राम नसल्याचे जाणवले, म्हणून तो कंठा फोडला. सीतामाईंनी विचारल्यावर त्याने छाती फाडून राम–सीता आपल्या हृदयात आहेत हे दाखविले. हीच परिपूर्ण समरसता—ज्यात बुद्धी नाही, तर पूर्ण आत्मसमर्पण असते.
महाराज सांगतात की काही लोक बुद्धीचा दुरुपयोग करून स्वतःलाही आणि इतरांनाही फसवतात. “Intelligence dominates your consciousness” म्हणजे बुद्धी सतत सक्रिय ठेवल्यास मन कधीच शांत होत नाही. याउलट गुरुंनी सांगितलेली उपासना दररोज करणे, टाळाटाळ न करणे, जसे खाणे–झोपणे रोजचे असते तसेच उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मन स्थिर होते, ओढ वाढते आणि स्वानंदाचा अनुभव सुरू होतो.
गुरु हा देह नाही तर शुद्ध तत्त्व, चमत्कार नव्हे तर अनुभव, बुद्धी नव्हे तर समरसता, आणि सातत्यपूर्ण साधनेतून मिळणारी आत्मिक स्थिरता—हेच अध्यात्माचे खरे सार आहे.