श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: नरेंद्रनाथ महाराज

नरेंद्रनाथ महाराज

मानवाच्या उध्दारासाठी, उन्नतीसाठी अखंड परंपरेने कार्य करणार्‍या नाथपंथातील प. पू. श्री व्यंकटनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर गुरु आज्ञेनुसार ते कार्य प. पु. श्री नरेंद्रनाथ महाराज नाथशक्तीपीठ अकोला येथून करीत आहेत. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री नरेंद्र जगन्नाथ चौधरी. यांचा जन्म १९३७ साली अकोल्यातील उच्चविद्या विभूषीत घराण्यात झाला. त्यांचे वडील अॅड्व्होकेट श्री जगन्नाथ चौधरी व काका श्री गणपती चौधरी शिक्षक होते. त्यांच्या आई काॅंग्रेसच्या चळवळीत सक्रीय होत्या. बालशिक्षण पध्दती त्या काळात त्यांनीच प्रथम सुरु केली. लहानपणापासूनच ते विज्ञान निष्ठ, कर्तव्यतत्पर व चिकित्सक वृतीचे होते. त्यामुळेच त्यांचा देव, धर्म, योग, साधना, अध्यात्म या गोंष्टीवर थोडाही विश्वास नव्हता. लहानपणी आईला ते नेहमी म्हणत “त्या दगडाच्या देवांची पुजा करण्यापेक्षा मला सांग तुला काय हवे? ते मी देतो! तो दगड काय करणार आहे?” १९५८ साली त्यांनी नागपुर विद्यापीठातून बी. कॉम. केले व ते १९६२ साली चार्टर्ड अकाऊटंट झाले. याच दरम्यान त्यांनी ICWA (Inter), LLB (Part I), Short Hand Typing, Radio Engineering, M. Com. केले. याच काळात त्यांचा नाथपंथातील योगाभ्यानंद श्री व्यंकटनाथ महाराजांशी संबंध आला. महाराजांच्या सहवासात कल्पनेपलिकडील व केवळ जादु चमत्कार सदृश गोष्टी घडताना पाहुन, मानवाच्या शक्तिपलिकडेही काही शक्ति आहेत याची त्यांना प्रथमच जाणीव झाली. अशा शक्ति या कल्पना नसून प्रत्यक्षात एक वैज्ञा­निक शास्त्र आहे. ज्यांच्या सहायाने योगी सत्पुरुष अलौकिक असे कार्य करु शकतात हे लक्षात आल्यावर नरेंद्रनाथांनी १९६३ च्या नाथषष्ठीला सद्गुरु व्यंकटनाथांचा अनुग्रह घेतला आणि तेथून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.

१९६३ साली त्यांचा विवाह नागपुर विद्यापीठाच्या कु. कुंदा तांबे यांच्याशी झाला. प्राध्यापिका सौ. कुंदा चौधरी या अर्थशास्त्राच्या HOD होत्या. त्यांचा मुलगा चार्टर्ड अकाऊटंट व मुलगी M. Com आहे. नरेंद्र चौधरींनी पुणे विद्यापीठाला प्राध्यापक म्हणून व परीक्षक म्हणून कार्य केले. ते ICAI बोर्डाचे परीक्षक होते. व्यवसाया अंतर्गत त्यांचा संबध प्राध्यापक प्र. के. अत्रे तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी इत्यादींशी आला. याच कालावधीत त्यांनी Secretarial Practice या विषयाचे पुस्तक प्रसिध्द केले. अनेक विद्यार्थ्यांना घडविले. मनोनिग्रह, जिज्ञासू वृत्ती, ज्ञान लालसा व गुरु आज्ञापालन या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अल्पावधीतच ते महाराजांचे एक अंतरंग शिष्य बनले.

स्वतः श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या शब्दांत त्यांचा हा प्रवासः “बौध्दीक तारे तोडणार्‍या मला ज्यांनी ज्ञानाची दिशा दिली, कर्महीन अशा माझ्याकडून ज्यांनी सतत कर्म करवून घेतलं, व्यवहार ज्ञान व आध्यात्मिक ज्ञानाची ज्यांनी सांगड घालून दिली. भक्ती, बुध्दी, चातुर्य व कारणमीमांसांचे ज्यांनी ज्ञान दिलं; वेद आणि धर्मग्रंथाची ओढ लावून दिली, नाथपंथाचा महिमा स्वतः त्यांनी सांगून पंथ कार्यपध्दतीचं ज्ञान दिलं, विभूतीची सिद्धता कशी करावी हे सांगून त्याचा उपयोग कसा व केव्हा करावा हे ज्यांनी सांगितलं; मंत्र, तंत्र, ध्यानधारणा, उपासना आदींचे ज्ञान देऊन ते लोकोध्दारार्थ कसं वापरायचं, ‘जलात असोनी त्या वाचुनिया’ कसं रहायचं हे ज्यांनी शिकवलं व करवून घेऊन स्वतः त्यांना पाहिजे तसं मला घडवलं आणि सरतेशेवटी म्हणाले — ‘तू चालला तर मी चाललो, तू बोलला तर मी बोललो, जे तू केलं ते मी केलं, जे मी केलं ते तू केलं, मी म्हणजे तू व तू म्हणजे मी आहे. तू आणि मी दोघेही एकच आहोत.’ हे एवढं बोलून ज्यांनी पुढील गुरुकार्याची आज्ञा केली व गुरुकार्याचे दुसरे अखंड पर्व चालु झाले.”